Marathi Sahitya - Madhurani - CH-44 गोडाऊन
मधुराणीच्या गोडाऊनकडे जाता जाता गणेशने बैलगाडीकडे नजर टाकली. बैल बाजूलाच एका खांबाला बांधले होते आणि त्यांच्यासमोर कडबा टाकलेला होता. आता ते बसलेलेच होते. थकलेले दिसत होते. गणेशला बैलगाडीत काहीतरी धान्य सांडलेले दिसले. त्याने निरखून पाहिले तर ती करडी होती.
पोते गाडीतून गोडाऊनमध्ये नुकतेच टाकून झाले असावेत...
कदाचित त्या माल ठेवण्याच्या आवाजानेच आपल्याला जाग आली असावी...
गणेश गोडाऊनच्या दरवाजाकडे वळला. दरवाज्यापाशी जाताच तो एकदम थबकून थांबला. आत संभाजीराव आणि मधुराणी काहीतरी बोलत होते. बाहेर अंधार असल्यामुळे त्यांना गणेश दिसत नव्हता. गणेश अजून जवळ जाऊन कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करु लागला. त्याने बघितले. अचानक मधुराणीने संभाजीरावचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, " संभाजी... तुमी हाय म्हून एवढं करता माझ्यासाठी ... नायतर मला माझी शेती पडीक ठेवायची अन् उपाशी ऱ्हायची येळ आली आसती."
इकडे गणेशला त्याच्या पायाखालची जमीन सरकत आहे असं वाटत होतं. त्याच्या डोक्यात जसे विस्फोट होत होते. कुणी बंदुकीच्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या जणू त्याच्या डोक्यात डागत आहे असं त्याला वाटत होतं.
संधीचा फायदा घेत संभाजीरावने मधुराणीला जवळ ओढण्याचा प्रयत्न करताच.
" अरे मी कुलूप किल्ली कुठं ठेवली? " असं म्हणूने मोठ्या शिताफीने त्याच्या तावडीतून तिने आपली सूटका करून घेतली.
" नायतर आपण टाकलेल्या पोत्याखालीच दबायची..." असं म्हणत मधुराणी खोलीत इकडेतिकडे फिरून कुलूप किल्ली शोधायला लागली.
शोधता शोधता मधुराणीच्या पायाजवळून एक उंदीर पळाला. तिने तो आपल्या पायाने मोठ्या शिताफीने आणि निर्दयतेने चिरडून टाकला.
किती निर्दयी बाई ही... गणेशने विचार केला.
अगदी भावनाशून्य...
तो उंदीर म्हणजे आपणच असे त्याला एक क्षण वाटून गेले.
आणि मी ही किती वेडा...
इच्या जाळ्यात अडकलो...
तोच हा प्रकार आपण जर बघितला नसता तर तिच्या या निर्दयीपणे उंदीर मारण्याच्या कृत्याला आपण तिचा शुरपणा म्हटलं असतं....
" बाई मी पण किती येडी ... ही काय इकडं देवळीत हाय ... " असं म्हणत मधुराणीने देवळीतून कुलूप किल्ली उचलली.
" संभाजीराव किती येळ झाला... " मधुराणीने संभाजीरावांना वेळ विचारली.
" अकरा बारा वाजले असतील " संभाजीराव म्हणाले.
" लई येळ झाली नाय" म्हणत कुलूपकिल्ली घेऊन मधुराणी दरवाजाकडे यायला लागली.
मधुराणीला दरवाजाकडे येतांना पाहून गणेश चटकन दरवाजातून बाजूला झाला.
म्हणजे मधुराणी आपल्या एकट्याशीच तशी वागत नाही...
तर बरेच पक्षी तिने तिच्या जाळ्यात फासलेले असले पाहीजेत...
गणेश मोठ मोठे पावलं टाकीत आपल्या खोलीकडे गेला. दरवाजाची कडी काढून तो आत गेला आणि आतून अंधारातून खिडकीतून बाहेरचे दृष्य पाहू लागला.
मधुराणी कुलूप किल्ली घेऊन येऊन दाराच्या बाहेर उभी राहाली. जड पावलांनी संभाजीराव तिच्या मागून बाहेर आला. मधुराणीने कुलूप किल्ली संभाजीरावच्या हातात दिली. कुलूप किल्ली त्याच्या हातात देतांना न चूकता तिने आपल्या हातांचा स्पर्श त्याचा हाताला केला कदाचित त्याचा हातही दाबला असेल.
गणेशच्या मेंदूवर चढलेले मधुराणीच्या नशेचे एक एक आवरण दूर होताहेत असं गणेशला वाटत होतं.
एकीकडे गणेशला मधुराणीचा राग येत होता तर एकीकडे त्याला स्वत:चाच राग येत होता.
मग संभाजीरावने गोडाऊनचे कुलूप लावले आणि चाबी मधुराणीच्या हातात दिली. तोही तिच्या हाताला स्पर्श करण्यास विसरला नाही. मधुराणी चाबी घेऊन आपल्या घराकडे गेली. घराच्या दारात उभं राहून वळून ती संभाजीरावकडे पाहून गोड हसली. दारातून घरात गेली. आणि संभाजीरावकडे बघत जड अंत:करणाने तिने दार बंद केले. संभाजीराव मंतरलेल्या स्थितीत बराच वेळ त्या बंद झालेल्या दाराकडे बघत होता.
गणेशला इकडे त्याच्या डोक्याच्या नसा फुटतात की काय असं होत होतं. त्याला मधुराणीसोबतचा एक एक प्रसंग आठवत होता.
तिची ती खोडकर नजर...
तिचे ते गोड हास्य...
तिचा त्याच्या हाताला मुद्दाम होणारा स्पर्श...
म्हणजे मधुराणीने आपल्याला फक्त जाळ्यात फसविले होते...
संभाजीला आपल्या जाळ्यात फसवून ती त्याच्याकडून शेतीचे कामं करून घेत होती...
पण आपल्याला जाळ्यात फसवून तिला काय फायदा झाला होता?...
मग त्याच्या लक्षात आले की मधुराणीच्या दूकानाचे हिशोबाचे कामं आणि तालूक्यावरून दुकानातलं सामान आणून देण्याची कामं तोच करत होता. तो ही कामं इतक्या आपलेपणांन आणि आपसूकपणे करीत होता की त्याला हे लवकर लक्षात आलेच नाही. आणि ही सर्व कामें त्याने स्वत:च आपल्या अंगावर ओढवून घेतली होती. त्यातला गुप्त हेतू हा की त्या निमित्ताने तो मधुराणीच्या जास्तीत जास्त सानिध्यात राहील. मधुराणीने कधीही स्वत:हून त्याला कोणतेही काम सांगितले नव्हते. फक्त तिने ती कामं आपण स्वत:होऊन आपल्या अंगावर ओढवून घेण्यास पोषक वातावरण तयार केले होते.
किती धूर्त, मुरब्बी आणि चाणाक्ष बाई ही...
तिला कितीही विशेषनं लावली तरी ती त्याला तोकडीच वाटत होती. कारण कोणतेही विशेषन तिला पूर्णपणे सामावून घेण्यास असमर्थ होते.
आता त्याला मधुराणीचा पूर्णपणे उकल व्हायला लागला होता.
खरोखर ती एक राणी होती...
मधमाश्यांची राणी असते ना तशी....
आणि आपण तिच्या कामगार माश्यांच्या कळपातली एक क्षूद्र कामगार माशी....
तिच्या फक्त सहवासाच्या हव्यासापोटी राब राब नुसते काम करायचे... पण मधमाश्यांच्या कळपात नर मधमाश्याही असतातच की....
मग या कळपातली नर माशी कोण होती? ....
त्याला हा प्रश्न सतावू लागला...
पाटील? सरपंच, संभाजी की तिच्या दुकानात काम करणारा तरणा ताठा पोरगा? ....
की अजून कोणीतरी? ....
कोणीही असु शकतो...
आतापर्यंत आपण तिला आपल्या एकट्याचीच समजत होतो...
आता अचानक शक्यता कशा वाढल्या होत्या...
एक काचाचे ह्रदय फुटून त्याचे जसे अगणित तुकडे व्हावेत...
तशा शक्यताही अगणीत झाल्या होत्या...
खरंच आपण किती मूर्ख ठरलो ...
गणेशच्या ह्रदयात त्याला मूर्ख बनविल्याचे शल्य राहून राहून टोचत होते.
क्रमश:...





1 comments:
Weldone Sunil Bhau!
Keep it up!
Post a Comment