Marathi Fiction books- Madhurani - CH-59 झडप
ते लाल बावटे बांधलेले लोक आता काठ्या घेऊन स्टेजकडे झेपावले. पण गणेशराव आणि त्याचे साथी कार्यकर्ते त्यांना अडवू लागले. त्यामुळे त्यांच्यातही जुंपली. त्यांना माहित होतं की ही लोक जर स्टेजवर पोहोचली तर मधुराणी आणि तिच्या बरोबर असलेल्या इतर लिडर लोकांचं काही खरं नाही. मधुराणीच्या जीवालाही धोका होता. त्यामुळे गणेशराव आणि त्याचे कार्यकर्ते शर्थीने अक्षरश: त्याच्याशी एखादी खींड लढविल्यासारखे लढू लागले. ज्या आंब्याच्या झाडावरून मोहोळ उठले होते तेही गणेशराव जिथे त्या लोकांशी चार हात करीत होते तिथून जवळच होते. त्या माश्या तिथेसुध्दा पोहोचल्या होत्या. मधुराणीच्या कार्यर्कत्यांना अक्षरश: दोन शस्रांशी लढावे लागत होते. त्या लाल दिवटे बांधलेल्या लोकांच्या काठ्या आणि त्या उठलेल्या मोहोळाच्या माश्या. गणेशरावचा चेहरा तर दोनतीन माशा डसल्यामुळे सुजून टंब झाला होता. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. हे लोक स्टेजवर पोहोचता कामा नये. मधुराणीचा जीव वाचवणे सगळ्यात महत्वाचे.
नाही काहीही झालेतर बेहत्तर ...
मधुराणीला काहीही व्हायला नको ...
शेवटी तीच तर आता आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा सहारा झाली होती...
कितीही नाही म्हटलं तरी आपला तिच्यावर जीव बसलेला आहे...
नाहीतर आपण जीवाची पर्वा न करता एवढ्या शर्थीने लढलो असतो का? ...
त्यांच्या समोर काही कार्यर्कत्याने तिथून काढता पाय घेऊन पळ काढला होता.
आपणही तसा पळ काढू शकलो असतो...
पण गणेशरावमध्ये आज काय संचारले होते काय माहित. ते या वयातही एकेका लाल दिवटे बांधलेल्या लोकांचा फज्जा पाडत होते. त्यांच्या हातातही एक काठी आली होती. ते ती एखाद्या तलवारीसारखी फिरवत होते.
हा सगळा गोंधळ चालू असतांना गणेशरावला मधूकराव त्यांच्या जवळून स्टेजकडे जात असलेले दिसले. त्यांची नजरा नजर होताच मधूकरराव गणेशरावला म्हणाले, " गणेशराव एकही दिवटा वर पोहोचला नाही पाहिजे ... साल्यांचा जीव घेण्याची वेळ आली तरी बेहत्तर... मी तिकडे मधुराणीच्या सुरक्षतेची व्यवस्था करतो."
पोलीसांची मागावून मागावलेली तुकडी आली होती. अश्रूधुरांच्या नळकांड्या फुटत होत्या. पण लोक कशालाही जुमानत नव्हते. कदाचित तो सगळा बंदोबस्त लोकांच्या संख्येच्या मानाने अगदीच तोकडा होता. गणेशराव आणि त्याच्या साथीदाराने यशस्वीरित्या लढून लोकांना स्टेजकडे जाण्यापासून रोकण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते. तेवढ्यात गणेशरावच्या अगदी जवळचे तिन कार्यकर्ते त्यांच्याजवळ आले. गणेशरावच्या लक्षात आले की त्यांना काहीतरी खाजगीत बोलायचे होते. गणेशराव तेथील जबाबदारी इतर कार्यकर्त्यांवर सोपवून त्यांना घेवून बाजुला गेले.
'' साहेब खबर चांगली नाही...'' त्यातला एकजण म्हणाला.
'' काय झालं... जरा स्पष्ट सांग..'' गणेशरावच्या पोटात गोळा उठला होता.
मधूराणीला काही झालं की काय?...
'' मधूकराव आज तुमचा घात करण्याच्या विचारात आहे'' त्यातला एकजण म्हणाला.
'' काय?... तुम्हाला कोणी सांगितलं?'' गणेशरावांनी आश्चर्याने विचारले.
त्यांना असं कधीतरी होईल याची खात्री होतीच. पण ते इतक्या लवकर होईल याची अपेक्षा नव्हती.
'' राजूनं त्याच्या स्वत:च्या कानानं.. मधुकररावला... काशीनाथला सांगतांना एकलं'' त्यातला एक म्हणाला.
'' काय म्हणाला तो?'' गणेशरावांनी विचारले.
'' आज चांगला मौका आहे... गण्याला लेकाला आज ठेचा... माझ्याशी बरोबरी करतो साला... त्याला माहित नाही वाटतं एका म्यानात एकच तलवार राहू शकते म्हणून...'' असा म्हणाला होता तो काशीनाथला.
'' अ...सं'' गणेशराव विचार करत म्हणाला.
'' मग आता कसं करायचं?'' गणेश पुढे जणू स्वत:शीच बोलला.
'' साहेब तुम्ही आज्ञा द्या'' त्यातला राजू म्हणाला.
गणेशने राजूकडे निरखून पाहाले. त्याचा निश्चय पक्का दिसत होता. आणि या क्षणी त्याला कोणतीही आज्ञा दिल्यास तो स्वत:च्या जिवाचीही पर्वा न करता पार पाडणार होता यात शंका नव्हती.
गणेशरावचे आता जबडे वळू लागले होते.
'' हो त्याचं बरोबर आहे .. एका म्यानात एकच तलवार राहाली पाहिजे'' गणेश स्वत:ची सोन्याची चैन आणि अंगठ्या काढत त्यांच्या हवाली करीत निश्चयाने म्हणाला.
'' जी साहेब ... जशी तुमची आज्ञा... तसं तेही स्टेजच्या जवळ खाली गर्दीत उतरलं आहे... एका काठीत तं राम दावतो त्याला...'' त्यातला एक आडाणी आडदांड साथीदार बिंबा म्हणाला,.
'' हो साहेब'' बाकिच्या दोघांनीही हमी भरली.
आणि ते आपापल्या काठा सांभाळत मधूकराव ज्या बाजुला होता त्या बाजुला जावू लागले.
क्रमश:...





2 comments: