Marathi kadambari - Madhurani CH-58 मधूराणीचं भाषण
बाकीच्या लिडर मंडळीची भाषणं आटोपल्यावर मधुराणी भाषणासाठी उभी राहाली. माइकसमोर गेल्यावर तिने एक बराच मोठा पॉज घेऊन समोर बसलेल्या लोकांच्या भव्य समुदायावर एक नजर फिरविली. सगळीकडे शांतता पसरली. जे काही लोक पेंगुळले होते ते कान टवकारुन ऐकण्यासाठी तयार झाले.
" बंधू आणि भगिनींनो..."
पुन्हा पॉज. लोकांचा टाळ्यांचा कडकडाट. आता कार्यर्कत्यांनी नव्हे तर लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या होत्या. शेवटी मधुराणीचे भाषण सुरु झाले या आनंदाने.
'चॅरिस्मा' म्हणतात तो हाच...
गणेशराव अभिमानाने तिच्याकडे पाहत होते.
नंतर मधुराणीचे जे भाषण सुरु झाले ते जवळपास पंचेचाळीस मिनिटे चालले. तिने लोकांना जसे मंत्रमुग्ध करून सोडले होते. गणेशरावने तिच्या वर्क्तुत्वाबद्दल आत्तापर्यंत नुसते ऐकलेच होते. आता ते स्वत: अनुभव घेत होते. खरोखर गणेशराव मंत्रमुग्ध झाले होते.
ते भानावर आले ते जनतेच्या समुदायात एका कोपऱ्यातून आलेल्या घोषणांमुळे.
" मधुराणी मुर्दाबाद..." कोपऱ्यातून एकदम अनपेक्षित घोषणा आल्या.
गणेशरावने वळून बघितले. तिकडे कोपऱ्यात लाल बावटे बांधलेले काठ्या घेऊन उभे असलेले काही तरुण त्यांना दिसले.
तरी मघाशी कुजबूज होतीच की कोणीतरी सभेत गोंधळ घालणार आहे म्हणून...
हे संपतराव पाटलाचा मुलगा दिपक पाटलाचं काम असावं...
संपतराव पाटील अपघातात मरण पावल्यापासून त्यांचा वारसदार मुलगा दिपक पाटलाने राजकारणाची सर्व सुत्र आपल्या हातात घेतली होती. त्यालाही कदाचित कल्पना असावी की त्याच्या वडीलाच्या मृत्यूमागे मधुराणीचाच हात असावा. कारण तेव्हापासूनच त्यांच्यातले सबंध दुरावत आणि बिघडत गेले होते. संपतराव हयात असते तर त्यांनी असा मार्ग चोखळला नसता. पण हा नव्या जोमाचा तरुण पोरगा. अंगात तरुण रक्त सळसळत होतं.
" मधुराणी मुर्दाबाद..." घोषणांचा जोम वाढतच होता.
सगळीकडे गोंधळ माजण्याची चिन्हं दिसत होती. मधुराणी एक क्षण थांबली. तिने मधूकरराव आणि इतर कार्यकर्ते मंडळीकडे एक नजर टाकली. मधुराणी आणि मधूकरावांमधे नजरेचीच काय मुक देवाणघेवाण झाली कुणास ठावूक. तो मोठ्या आवेशाने आपल्यासोबत आपल्या कार्यर्कत्यांना घेऊन तिकडे कोपऱ्यात जिकडून घोषणा येत होत्या तिकडे निघाला. मधुराणीने काहीही झाले नाही असा आव आणून आपले भाषण चालूच ठेवले.
मधूकरराव आणि त्याच्यासोबत बाकीचे चाळीस पन्नास कार्यकर्ते गेल्यावर प्रकरण अजूनच बिघडले. त्या लोकांजवळ काठ्या होत्याच त्यांनी काठ्यांनी मधुराणीच्या कार्यर्कत्यांना मारणे चालू केले. मधुराणीचे कार्यकर्तेही काही कमी नव्हते त्यांनीही त्यांच्याजवळच्याच काठ्या हिसकून त्यांनाच मारणे सुरु केले. पण इकडे जमलेल्या लोकांत गोंधळ सुरु झाला. पळापळी सुरु झाली. मधुराणीला भाषण थांबवावे लागले.
एक पोलीस अधिकारी माइकवर लोकांना शांत राहण्याचे आव्हान करु लागला. पण आता लोक आवाक्याबाहेर गेले होते. ते लाल दिवटे बांधलेले आणि काठ्या घेतलेले लोकही आता संख्येने वाढू लागले. ते काठ्यांनी आणि मधुराणीचे कार्यकर्ते त्यांच्याजवळ काही नसल्यामुळे आता दगड मारु लागले. ते कुठून येत होते काही पत्ताच लागत नव्हता. कदाचित ते आधीच लोकांत येऊन इकडे तिकडे विखुरले असावेत. त्यात अजून गोंधळ म्हणजे मधुराणीच्या एका माणसाने मारलेला एक दगड तिथे मैदानात आंब्याच्या झाडावर असलेल्या एका आग्या मोहोळाला जाऊन लागला. त्या सगळ्या माश्या उठल्या आणि तिथे जमलेल्या प्रेक्षक जनतेला डसू लागल्या. त्या माशांना काय... कोण मधुराणीकडचा? आणि कोण विरोधातला?. त्या सापडेल त्याला डसू लागल्या. त्या मोहोळाच्या माश्यांमुळे तर लोकांत अजूनच गोंधळ वाढला, चेंगरा चेंगरी वाढली.
हे सगळं मधुराणीच्या विरोधकाचंच कट कारस्थान होतं पण ते या स्तराला जातील किंवा प्रकरण एवढं बिघडेल असा कुणालाच अंदाज नव्हता. पोलीस अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनला फोन करून शस्त्रास्त्राने लेस अजून पोलीस बोलवून घेतले.
क्रमश:...





0 comments:
Post a Comment