पूर्ण पटांगण गच्च भरलं होतं. आता मधुराणीचीच वाट होती. तशी तिची तिथे येण्याची जाहिर वेळ होऊन वर एक तास होऊन गेला होता. दोनदा तीनदा अफवा पसरली की मधुराणीची गाडी आली तसे कार्यकर्ते एकदम गडबड करु लागत. ही अफवा कदाचित मुद्दामच कुणीतरी पसरवत असावा. म्हणजे जेवढं पब्लीकला ताटकळत ठेवलं तेवढं लिडरचं महत्व वाढतं. आणि पब्लीक नुसती वाट पाहून पेंगायला नको. सदैव त्यांनी जागृत राहून आपल्या नेत्याची वाट पहायला हवी. नाही तर वाट पाहून थकलेल्या मंडळीला आपला नेता आलेलाही कळायचा नाही. आता ती अफवाही जास्त वेळा पसरायला नको. नाही तर ते लांडगा आले रे आला सारख व्हायचं. राजकारण म्हणजे कसं योग्य गोष्टीचं योग्य वेळी योग्य प्रमाणात केलेलं मिश्रण असतं.
तेवढ्यात गणेशरावला दुसऱ्या एका ट्रकमधून उतरतांना अजून काही उजनीची मंडळी दिसली. हा ट्रक तसा उशीराच आला होता. कारण एव्हाना सभा सुरु व्हायला पाहिजे होती. कदाचित ही त्या ट्रकची उजनीची दुसरी वारी असावी. तसं गणेशराववर ज्या कामाची जबाबदारी सोपवली होती ते काम केव्हाच झालं होतं. आता फक्त मधुराणी येण्याची वाट होती. तेवढाच टाईम पास म्हणून पुन्हा गणेशराव तिकडे गेले. यावेळी त्यांची तिथे उजनीला राहणारा आणि गावोगावी मोटर पंप पंखे याचं मेकॅनिकचं काम करणारा बबन भेटला. अजूनही तो तेच काम करत होता. गावचे लोक ज्याला येडा म्हणत होते तोही भेटला. तो अजूनही येडाच होता. इकडे सगळे गप्पा मारत होते आणि त्याचं आपलं मधून मधून सुरुच होतं 'कधी सभा सुरु होते?... कधी सभा सुरु होते?'. गणेशरावला त्या गर्दीत मधुराणीचं शेत बघणारा संभाजीरावसुध्दा दिसला. पण का कोण जाणे त्याने पाहून न पाहिल्यासारखे केले आणि तो तिथून सटकला. मारोती टेलरही दिसला. तो स्वभावाने तसा लाजाळूच म्हणून काही बोलला नसावा कदाचित. गावातले महादा, लोखंड्या, भिका वैगेरे क्रिकेट खेळ्णारी मंडळी भेटली. त्यांच्याकडून कळले की आता गावात क्रिकेट खेळण्याचा वसा नविन पिढीने उचलला होता म्हणून. नविन पिढीतली क्रिकेट खेळणारी पोरं आधीच्याच फेरीच्या वेळी आली होती. त्यांचं आपलं मधुराणीला क्रिकेटची कीट मागण्याचं चाललं होतं. मागच्या निवडणूकीच्या वेळी मधुराणीने स्वखुषीने त्यांना क्रिकेटची किट दिली होती म्हणे. गणेशरावला त्यांच्या जुन्या क्रिकेट खेळणाऱ्या साथीदारांकडून कळलं. मधुराणीची तशी युक्ती छान होती. पोरांना क्रिकेटची कीट दिली की सारं गाव खूश. दोनतीन नवीन पोरं दिसली. गणेशरावने कुणाला तरी विचारले तर त्यातले दोन बंडू हॉटेलवाल्याची पोरं होती. माय बाप अजूनही तिकडे गावोगावी फिरुन त्यांचा हॉटेलचा धंदा सांभाळीत होती आणि ही इकडे उनाडसारखी इकडे तिकडे बेफिकीरपणे फिरत होती. कुणीतरी गावातल्याने त्यांची माहिती सांगता सांगता त्यांचा उध्दार केला. अन् त्यातलं एक पंधरा सोळा वर्षाचं पोर मुक्याचं होतं म्हणे. गणेशरावला अचानक मुक्याची अन् मुकीची गोष्ट आठवली.मुकीचं काय चाललं असेल?...
तिचं लग्न झालं असेल की नाही?...
ते ही सगळी माहिती गाववाल्यांना विचारणार एवढ्यात त्यांचा एक कार्यकर्ता लगबगीने येऊन गणेशरावला तिथून घेऊन गेला. जाता जाता त्यांच्या कानात त्या कार्यर्कत्याने सांगितले. " आज... सभेत गडबड होणाची शक्यता आहे... मधुकरावने सतर्क राहाण्यास सांगितले आहे..."
शेवटी एकदाची अफवा खरी झाली मधुराणीची गाडी आणि तिच्या गाडीच्या मागेपुढे सायरन वाजवत पोलीसांच्या गाड्या तिथे येऊन ठेपल्या. सगळ्या जमलेल्या जनमाणसात उत्साहची एक लहर पसरल्यासारखी दिसली. जमलेले सर्व लोक आपापले पाय ताणून, उंचावून साडी घातलेला ठिपका कुठे दिसतो का ते बघायला लागले. स्टेजवर गेल्यावर तो ठिपका दिसणारच होता. पण नाही तो ठिपका आधी दिसतो का याची घाई. स्टेजवर जातांना काही लोकांनी मधुराणीजवळ जाऊन तिच्या गळ्यात मोठमोठे फुलांचे हार घातले. ते हार कुणाला घालू द्यायचे आणि कुणाला नाही ते गणेशराव आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यर्कत्यांची जबाबदारी होती. ती त्यांनी चोख पार पाडली होती. हार घालतांना काही गोंधळ झाला नव्हता. कुणाला हार घालू द्यायचे त्यांना ओळखून आधीच गणेशराव आणि त्यांच्या माणसांनी मधुराणी जिथून स्टेजवर जाणार होती त्या रस्त्याच्या कडेला समोर उभे राहण्यास सांगितले होते. लोकांकडून हार स्वीकारल्यानंतर मधुराणी त्या फुलांच्या हारांना लोकांच्या गर्दीत फेकत होती. तो हार मिळविण्यासाठी किंवा त्या हाराचे एकतरी फुल मिळविण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडत असे.
आपल्या सोबत चारपाच लिडर घेऊन मधुराणी स्टेजवर पोहोचली. स्टेजवर पोहोचल्यावर तिने सगळ्या लोकांना हात ऊंचावून आणि हलवून अभिवादन केले. लोकही आपापले हात हालवून तिला अभिवादन करु लागले. आता एवढ्या लाखो लोकांत कोणाचा कोणता हात हे काही मधुराणीला कळणार नव्हते. पण नाही लोकांची आपली वेडी समजूत की मधुराणीने त्यांच्याकडे पाहूनच आपला हात हलविला.
क्रमश:...





4 comments: